महिला सक्षमीकरणासाठी उज्वल सेवाभावी संस्थेचा पुढाकार; हिरकणी पुरस्काराने कर्तबगार महिलांचा गौरव
जालना ( शालेय प्रतिनिधी ) :
तरुणांनी ध्येय प्राप्तीसाठी डोळ्यासमोर टार्गेट ठेवले पाहिजे. त्याशिवाय कोणतेच यश गाठता येत नाही. त्यासाठी प्रत्येकाला शिक्षणाचे महत्व कळाले पाहिजे तरच भविष्य उज्वल होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
जालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दि. 26 मे 2025 रोजी उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत हिरकणी महोत्सव आयोजित केले होते. यावेळी उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी बोलत होते. दरम्यान व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के, प्रमुख पाहुणे म्हणून जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने, शाहीर अप्पासाहेब उगले, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापिठाचे प्रा. बापूराव बनसोडे, संस्थेच्या अध्यक्षा सौ. करुणा अच्युत मोरे यांची उपस्थिती होती.
राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या आणि सामाजिक उपक्रमात सहभाग घेणार्या कर्तबगार महिलांचा हिरकणी पुरस्काराने गौरव करण्यात आला. राज्यातील शाळकरी मुली आणि महिलावर होणारे बालात्कार आणि छेडछाडीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी हिरकणी सुरक्षा अभियान सुरु करण्यात आले असून त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी मोफत ड्रायव्हिंग आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणासाठी लाभार्थी महिला आणि मुलीची लक्की ड्रा पध्दतीने निवड करण्यात आली. तत्पुर्वी उपस्थित महिलांना दामिनी पथकाच्या टीमकडून स्वसंरक्षण आणि निर्भीडपणे अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यानंतर महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत महिलांसाठी सुरु असलेल्या वन स्टॉप सेंटरच्या प्रकल्प प्रमुख वनिता पिंपळे यांनी अत्याचार पिडीत किंवा अडचणीच्या काळता महिलांसाठी असलेल्या योजनेची माहिती दिली. तसेच महिला व बाल कल्याण विभागाचे इंगळे यांनी एकल पालकत्व, लेक लाडकी, बाल संगोपन यासह विविध योजनेची माहिती देत अर्जही उपलब्ध करुन दिले. तर पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून स्थानिक गुन्हे शाखेचे संजय सोणवने यांनी मुलींना स्वसंरक्षण, सायबर सुरक्षा आणि महिला सुरक्षेच्या संदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर महिलांसाठी आयोजित केलेल्या होम मिनीस्टर कार्यक्रमात महिलांनी पैठणी, चांदीचं नाणं, रोख रक्कम असे विविध बक्षिसं जिंकून आनंदोत्सव साजरा केला. तर शाहीर रामानंद उगले यांचा सांस्कृतीक कार्यक्रम पार पडला.
दरम्यान जिल्हाधिकारी यांनी आपल्या भाषणातून महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात मार्गदर्शन केले. मराठवाड्यात महिला सक्षमीकरणाची अत्यंत गरज असून अनेकांच्या मानसीकतेत बदल करण्यात गजर आहे. आणि त्या दृष्टीने उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सक्रीयपणे काम करत आहे. मराठवाड्यात महिलांच्या बाबतीत कमी असलेले लिंग गुणोत्तर, मुलीचे शिक्षण, लग्नाचे वय, मुलीचे घरातील तसेच समाजातील स्थान, काम करण्याच्या ठिकाणचे स्थान, प्रॉपर्टीमध्ये स्थान यावर काम झाले पाहिजे. सामाजिक विचार करुन महिला आपल्या प्रॉपर्टीवरील हक्क सोडून देतात.परंतु, तीने जर प्रॉपर्टी मागीतली तर घरात वाद सुरु होतात. दोन मुला-मुलीतील भेदही पहायला मिळतात, कुणाला कीती शिकवायचे हे त्या कुटुंबाच्या मानसीकतेवर अवलंबून असते. मुलीला काहीहीही शिक्षण भेटले तरी छान म्हणून पुढे घेऊन जातात. मात्र मुलाच्या अनुषंगाने त्याला हवं ते जोपर्यंत भेटत नाही, तोपर्यंत रिपीट प्रयत्न करायला सांगता. त्याच्यासाठी घर गहान ठेवण्याची तयारी देखील असते. त्यामुळे त्यांच्या मानसीकता बदलन्यासाठी शासन प्रयत्न करीत असले तरी त्यात संस्थांचा महत्वाचा रोल आहे. असेही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगीतले.
मुली आणि महिलांना मोफत स्वसंरक्षण व चारचाकी वाहन प्रशिक्षण :
या हिरकणी सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून मुली आणि महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार असून लोकसहभागाच्या माध्यमातून 100 मुलींना मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण देऊन महिला वाहनचालक तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते चिठ्ठी काडून लक्की ड्रॉ पध्दतीने सुरु करण्यात आला आहे. यावेळी चिठ्ठी काढून काही मुलींची चारचाकी वाहनचालक प्रशिक्षणासाठी मुलींची निवड करण्यात आली. शाळकरी मुलीवर आणि टॅक्सी चालकाकडून महिलावर होणारे बालात्कार कमी करण्यासाठी महिला ड्रायव्हर घडविण्यात येत आहेत. त्यासाठी मुलींना आणि महिलांना मोफत चारचाकी वाहन प्रशिक्षण देऊन त्यांना स्वसंरक्षाणाचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .