पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसंदर्भात निर्माण झालेला पेच अखेर सुटला आहे. २०२४-२५ या वर्षाच्या संचमान्यतेनुसारच बदल्या कराव्यात, असा स्पष्ट निर्देश शासनाने दिला असून त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून बदली प्रक्रिया राबविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, या संचमान्यतेप्रमाणे शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी राज्यातील काही जिल्हा परिषदांकडून २०२३-२४ ची संचमान्यता गृहीत धरली होती तर, काही जिल्ह्यांनी २०२४- २५ची संचमान्यता विचारात घेऊन प्रक्रिया सुरू केली होती. त्यावर राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये २०२४- २५च्या संचमान्यतेप्रमाणे बदली करण्याचे सांगण्यात आले. कोणत्या वर्षाची संचमान्यता बदली प्रक्रियेसाठी गृहीत धरावी, यासाठी काही जिल्हा परिषदांकडून मार्गदर्शन मागविले होते. त्यानंतर झालेल्या २०२४-२५ या वर्षाच्या संचमान्यतेनुसारच बदल्या करण्याचे शासनाने दिले निर्देश बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले.
जिल्ह्यात ४०२५ हजार शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यानुसार बदली पात्र, बदली अधिकार प्राप्त, अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षकांच्या अंतिम यादी निश्चिती करून या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यानंतर पुढील टप्प्यात इच्छुक शाळांची नावे भरून घेतली जातील आणि टप्प्याटप्प्याने बदली प्रक्रिया सुरू होईल.
खोटी माहिती दिल्यास निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई
संचमान्यतेप्रमाणे शिक्षकांच्या बदल्या करण्यास शासनाने सांगितले आहे. त्यानुसार तयारी सुरू केली आहे. काही दिवसांमध्ये पात्र शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यापूर्वी आम्ही बदली प्रक्रियेच्या तयारीवर अधिक भर दिला आहे. बदली प्रक्रियेत बदली पोर्टलवर जर शिक्षकांनी जाणीवपूर्वक खोटी माहिती भरली आणि चुकीच्या पद्धतीने बदली करून घेतली अथवा बदलीतून स्वतःला वगळले किंवा त्यांच्या चुकीच्या माहितीमुळे त्यांची बदली झाली नाही किंवा बदली झाली तर त्यांच्यावर निलंबन करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले.
दुर्गम भागातील रिक्त जागा भरण्यात येणार
सुधारित थोरण १८ जून २०२४ मधील तरतुदीनुसार अपंग, विधवा, कुमारिका, गंभीर आजार असलेले, ५३ वर्षे पूर्ण असलेले, मूल अपंग, जोडीदार अपंग, आजी-माजी सैनिक पत्नी असलेले शिक्षक-विशेष संवर्ग १, पती-पत्नी एकत्रीकरण-संवर्ग २, बदली अधिकार प्राप्त संवर्ग-३, बदली पात्र- संवर्ग ४, आवश्यकता भासल्यास ५व्या टप्प्यात बदलीपात्र सेवाज्येष्ठ शिक्षकांमधून अवघड, दुर्गम भागातील रिक्त जागा भरण्यात येतील.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .