शिक्षक कविंनी मृग नक्षत्रा निमित्त केली शब्दांची ऑनलाईन पेरणी.. " कविता शेती मातीच्या "

शालेयवृत्त सेवा
0


रोपाला पाणी घालून केले कार्यक्रमाचे उदघाटन


अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंचचा उपक्रम


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

मृग नक्षत्रा निमित्त अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच महाराष्ट्र शाखा नांदेड च्या वतीने औरंगाबाद विभागीय ऑनलाईन कविसंमेलन नुकतच संपन्न झालं या संमेलनाचे अध्यक्ष उस्मानाबाद येथील बाल साहित्यिक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा बालभारती अभ्यास मंडळाचे सदस्य समाधान शिकेतोड तर उद्घाटक मुंबई येथील अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे संस्थापक तथा राज्याध्यक्ष नटराज मोरे होते. प्रमुख पाहुणे  विभागीय अध्यक्ष तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर आदी होते.


रोपाला पाणी घालून संमेलनाचे उद्घाटन झाले. श्री. मोरे यांनी उद्घाटकीय भाषणात विभागातील विविध जिल्हयाच्या शिक्षक कविना शुभेच्छा दिल्या.श्री मुनेश्वर यांनी मनोगत व्यक्त करून 'रानगंध ' ही कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदेड जिल्हाध्यक्ष मिलिंद जाधव यांनी केले तर जिल्हा सरचिटणीस रुपेश मुनेश्वर यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन करून आभार मानले. कविसंमेलनात गझलकार चंद्रकांत कदम, हृदयक्षर मिलिंद कंधारे, स्तंभलेखक नासा येवतीकर, कवयत्री अर्चना गरुड, महानंदा चिभडे, विजया तारू, कवीमित्र दर्शन जोशी, साहेबराव डोंगरे, भुमया इंदूरवार, सचिन बेंडभर , रामस्वरूप मडावी आदी सहभागी होते.


कवीसंमेलनाध्यक्ष समाधान शिकेतोड यांनी आपले मनोगत व्यक्त करून शेतकऱ्यांच्या जीवनावरती कविता सादर केली आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली..

"औत हाकला हाकला

 बाप थकला थकला 

कधी मस्तक फुटलं

औताच्या दांडीन 

सुटलेलं रूमण 

धरिता मांडीन "



गझलकार चंद्रकांत कदम यांनी शेती मातीच्या या विषयावरील सुंदर अशी रचना सादर करून दाद मिळवली..

"धर्माच्या पंथाच्या जातीच्या पातीच्या 

जागर करू या कवितांचा शेतीच्या मातीच्या 

कसा लागला क्रांतिकारी शेतीचा शोध 

मानवतेला कळू लागले हिरवे संबोध "


साहेबराव डोंगरे यांनी सुंदर गेय कविता गाऊन रसिकांच्या मनाचा ठाव घेतला..

"लागे मज लढा शेतीचा शेतीचा

 मोहवी मना गंध हा मातीचा 

तृप्त मातीत पिता पावसाचे पाणी 

जोजवी बीजाची पिले तानी तानी 

झाडे वेली गाणी आनंदाची गाणी "



हृदयक्षर मिलिंद कंधारे यांनी शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या मनातील घालमेल कवितेतून उद्युक्त केले..

"काही पानावर पडलाय मावा

 काही कुरतडले जात आहेत

 हळुवार मशागत चुकीची 

पक्की फसली पेरणी 

मेहनतीचे वाभाडे निघाले 

कळेना काय झाले ? "


महानंदा चिभडे या कवयित्रीने निसर्गाच्या सानिध्यातली सुंदर रचना सादर केली..

"धरणी माय माझी घेई सामावून  पाणी 

आणि शेतकरी मग पिकवी हिरवे रान 

पोटात आमच्या तृप्ती आराम

 बाकी बळीराजा काही दाम "



स्तंभलेखक नासा येवतीकर यांनी पावसावरची आणि शेतकऱ्यांच्या समस्या वरती कविता सादर केली..

"धरती ही छान भिजली

 पाऊसही पडला चांगला 

शेतकरी राजा देखील 

आनंदाने नाहून गेला "


कवियत्री अर्चना गरुड ह्यांनी निसर्गातील रम्य वातावरणातील सुंदर रचना सादर केली..

"लागे मृगाची चाहूल 

सजे बळी राजा रानी 

नदी-नाले खळाळत 

गाती झुळझुळ गाणी "



कवी सचिन बेंडभर यांनी पिकाची गाणी गेय कविता सादर केली..

"गात गाणी फिरे पाणी पाटातूनी खळखळ

तृष्णा भागवी पिकाची छाया धरते आभाळ "


विजया तारु  कवयित्रीनी मृग नक्षत्रावर सुंदर कविता सादर  केली..

"मृग नक्षत्राच्या सरी धडकता

 गंध दरवळतो मातीचे 

त्या गंधातून वीज चमकता 

रंग फुलवता धरतीचे "



भुमया इंदुरवार यांनी पावसाच्या अन शेतीच्या कविता सादर केली..

"थेंब पावसाचे येता माती गर्भार राहिली 

काळ्या मातीने मातीत रूप आपले पाहिली "


"कणाकणात जगाच्या 

मनामनात बोलतो 

माझा विठू पांडुरंग 

माझ्या शिवारी डोलतो "

 दर्शन जोशी या कवींनी पांडुरंग अन शिवार यांचे सुंदर असे मिश्रण करून गेय कविता सादर करून वाहवा मिळवली.


हा कार्यक्रम मंडळाच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब वर प्रसारित झाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. असंख्य रसिक ऑनलाइन उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)