देविदास तारू यांचे स्व कथन 'आता मव्ह काय'चे प्रकाशन आज दिनांक 29 जून 2023 रोजी नांदेड येथे ज्येष्ठ लेखक संपादक उत्तम कांबळे यांच्या हस्ते संपन्न होत आहे त्या औचित्याने..
देविदास तारू एक स्वतःने स्वतःला सिद्ध केलेले नाव. ते सध्या पेशाने शिक्षक आहेत. सातत्याने नावीन्याची ओढ, रचनात्मक कार्यात झोकून देण्याची त्यांची वृत्ती आणि संयमी राहून माणसं जोडण्याचा त्यांचा स्वभाव. त्यांच्या 'आता मव्ह काय',या स्वकथनांमधून प्रवाहीपणे उमटतो.
'आता मव्हं काय', हे त्यांचं स्वकथन नुकतच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केले आहे.मराठी आत्मकथनाला नवा आयाम देणारे ,एका गलितगात्र आणि परिस्थितीने गांजलेल्या अवस्थेतून स्वतःला सावरत,आयुष्य सर्वांग सुंदर करणाऱ्या युवकाची ही गाथा आहे .
मराठी सारस्वतातील सिद्धहस्त लेखक आणि संपादक उत्तम कांबळे यांची भावस्पर्शी प्रस्तावना या स्वकथनास आहे ."गर्द अंधाऱ्या रात्रीच्या प्रवास कसा असतो आणि टिपूर चांदण्यात आंघोळ करीत करावयाचा प्रवास कसा असतो अशा विलक्षण अर्थवाही शब्दातून उत्तम कांबळे देविदासच्या स्वकथनाची संवेदनशीलपणे नोंद घेतात.
देविदास तारू नावाचं अख्खं व्यक्तिमत्व अत्यंत प्रवाही आणि संवेदनशीलपणे त्यांनी मांडले आहे.ही प्रस्तावना वाचतानाच आत्मकथनाबद्दलची उत्कंठा वाढीस लागते. प्रत्येक माणसाचं अख्खं आयुष्य सुखदुःखाचा सारीपाट असतो .त्यातही दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असेल ,निवारा नसेल अशा प्रतिकूलतेत स्वतःला कसं उभं करायचं, कसा रस्ता शोधायचा हे समजून घ्यायचं असेल तर तारू यांचे स्वकथन अगदी मनात मुरवून वाचावं लागेल .
देविदास तारू हा एक गुणग्राहक शिक्षक आहे .उत्तम वक्ताआहे. कार्यकर्ता आहे, संभाषण चातुर्य असणारा हजरजवाबी व्यक्ती आहे. माणूस म्हणून ,मित्र म्हणून ,भाऊ ,मुलगा, पती म्हणून या सर्वच नात्यांमध्ये परफेक्ट होऊ पाहणारा देविदास सर्वांचाच प्रिय होतो . स्वकथनाचं सारं कथानक नांदेड परिसरातील आहे .गोदावरीच्या काठावर वसलेल्या भीमघाट परिसराचा, इथल्या लोकांच्या जगण्याचा इतिहास ,किंबहुना समाजशास्त्रीय ग्रंथ आहे.
लेखक म्हणून नाव नसतानाही केवळ जिवंत अनुभव आणि त्यातल्या प्रामाणिक मांडणीतून हे लेखन वाचनीय बनते. मराठी आत्मकथनातील जी मोजकी आत्मकथनं मानांकित ठरली त्यातच' आता मव्हं काय,' ची गणना निश्चित होईल. उपशीर्षके देऊन एकेक प्रसंग त्यांनी अतिशय सुंदरपणे रेखाटला आहे . दैदास्या ते डॉ. देविदास हा प्रवास विलक्षण स्फूर्तीदायी आहे.
लेखकाची माय जमनाबाई तिच्या आयुष्यातील फरफटीचे हे कथन आहे. एकाच वेळी आई जमनाबाई ,बापू कचरू, सावत्र आई गिरजाबाई हिराआजी या सगळ्यांच्या जगण्याची चित्तरकथा ,त्यांचे स्वभाव हळुवारपणे लेखक चितारतात. खेड्यापाड्यातून जातीय तेढ किंवा रोजगारासाठी नांदेडात स्थलांतरित झालेल्या लोकांना उदरनिर्वाचे साधन असणारी उस्मान शाही मिल व परिसर अस्थायी मील कामगाराची व्यथा अत्यंत रोचकपणे पुढे येते .प्रत्येक पात्राची गुणवैशिष्ट्ये अत्यंत खुबीने लेखकाने रेखाटले आहेत. आजीची नस ओढण्याची तलप, बापूचा करारीपणा ,आईचा तापटपणा, शिक्षकांचे प्रेमळ वागणे समजून घेणे या साऱ्याच गोष्टी अत्यंत तरलपणे त्यांनी मांडल्या आहेत .
गेल्या चार दशकातील ग्राम्य जीवन , दलितांचे जगणे ,जातीयता ,गाव व गावाजवळचा निसर्ग, माणसाचे बहुपदरी स्वभाव या कथनात दिसतात .लेखकाचा दोन मायींचा विस्तार आहे. मूल होत नाही म्हणून बापूंने दुसरे लग्न केलं आणि दोनच वर्षात देविदासचा जन्म झाला. आईला जगण्याचा भक्कम आधार मिळाला . दैदास्या चोऱ्या करतो, गांजा पितो ,दारू पितो, व्यसनाच्या आहारी जातो, रेल्वेचे टपावरून पळतो, खिडकीला लोंबकळतो , व्यसनांच्या आहारी जातो आणि त्यातून स्वतःच सावरतो. शाळेच्या रस्त्याला लागतो .गुणांकनाने पास होत सरते शेवटी शिक्षक होतो. राज्य पुरस्कार मिळवतो. मानांकित होतो.
खोडकर, कसलेही धाडस करणारा देविदास कधी हरतो कधी जिंकतो प्रेम सुलभ भावनेत रमतानाही अपयशी ठरतो. आणि याच काळात लेखकाच्या स्वप्नातील सिंड्रेलाचं आगमन होतं. लेखकाच्या आयुष्यातील म्हाळसा म्हणजेच पल्लवीचे येणे लक्ष्मीचे चाहूल ठरते. समंजस स्वभाव आणि कसल्याही प्रतिकूलतेत समर्थपणे साथ देणारी त्यांची पत्नीही आईबरोबरच देविदासच्या व्यक्तिमत्त्वाची शिल्पकार आहे. मित्र ,नातेवाईक, सहकारी ,विद्यार्थी, शिक्षक, कार्यकर्ते या साऱ्यांच्या गुजगोष्टी लेखनात आल्या आहेत. लेखकांनी या साऱ्याप्रतीच अपार कृतज्ञता व्यक्त केली आहे. एकूणच हे सारे आत्मकथन गेल्या पन्नास वर्षातील ग्राम्यवस्थेचं विहंगम दर्शन घडवणारे, अत्यंत संवेदनशील काळाच्या नोंदी असलेले लेखन आहे. त्यांच्या पुढील लेखन प्रवासास शुभेच्छा.
-डॉ.विलास ढवळे
" आता मव्हं काय "
स्व कथन
लेखक : डॉ.देवीदास तारू
मूल्य: ३०० ₹
मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .