एकापेक्षा एक कविता सादरीकरणाने रंगली श्रावणसरी ' काव्यमैफल '
अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ ( महाराष्ट्र ) तालुका शाखा किनवटचा उपक्रम !
नांदेड ( मिलिंद जाधव) :
किनवट येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील निसर्गकवी ना.धो. महानोर सभागृहात अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाच्या वतीने एकापेक्षा एक कविता सादरीकरणाने श्रावणसरी काव्यमैफल रंगली.
कवीसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी माहूरचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र जाधव होते तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद हायस्कूल पार्डीचे मुख्याध्यापक मोहन जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर आणि विभागीय सचिव शेषराव पाटील होते. सर्वप्रथम रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाकवी वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे संस्थापक सुरेश पाटील यांनी स्वागत गीत गायले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष रामस्वरूप मडावी यांनी केले. रुपेश मुनेश्वर यांनी बहारदार सुत्रसंचालन केले तर सूर्यभान खंदारे यांनी आभार मानले.
" भिजर्या शेतांना, चिंब पानांना
साद घालती वारे...
भिजरी पहाट, भिजरे झुले,
भिजरे मोर पिसारे...
आज धुंद श्वास श्वास
मंद मंद सा सुवास..
मन फुलत फुलत फुलत जाई...
श्रावणात घन बरसे... "
हृदयाक्षर मिलिंद कंधारे यांनी गेय स्वरूपात कविता सादर करून काव्यमैफलीस रंगत आणली तर कवयित्री अर्चना गरुड ह्यांनी सुंदर कविता सादर करून दाद मिळवली.
"ढोल गर्जना करून
नभ उतरू ते आले
मृग टपोर्या थेंबात
चिंब सर्वांगी नहाले "
गझलकार सागर चेक्के यांनी बहारदार गझल सादर करून वाहवा मिळवली..
"दूर उभी ती भिजुनी चिंब पाऊस झाली,
उगाच मजला भिजवून गेला पाऊस ओला
तडपत असतो चातक जेव्हा थेंबासाठी,
श्रावणात मग सागर झाला पाऊस ओला "
कवयित्री विजया तारु ह्यांनी सुंदर रचना सादर केली..
"रुणझुण वाजे पैंजण
नाचु लागे हे अंगण
इंद्रधनुच्या कमाणी
रंग खुलवी श्रावण "
सांगावाकार महेंद्र नरवाडे यांनी
बालकविता सादर करुन टाळ्या मिळविल्या..
"मेघ गर्जनेसह पाऊस येई
पडती धारा रप रप रप
इंद्रधनुष्य सुंदर कधी तर
श्रावण सरीची टप टप टप "
कवयित्री सिमा साळवे ह्यांनी माहेराच्या ओढीची रचना सादर केली..
" रुप पाहुनी सृष्टीचे
मन होई अल्हाददायी
मास श्रावण सणाचा
ओढ माहेरला लावी "
वंदना तामगाडगे या कवयित्रीने आत्महाक सांगणारी कविता सादर केली..
"प्रश्न बदलतात उत्तरेही बदलते
समस्या मात्र बदलत नाही
नारी तुझा अपमान आणि छळ
कधीच का ग सरत नाही ? "
कवी राजेंद्र चारोडे यांनी कष्टकरी शेतकऱ्यांची महती सांगणारी रचना सादर केली..
" निर्झर वाजवितो पावा तरु धरुनिया फेर
माती लावून छातीला बाप करितो पेर
कष्ट नित्याचेच माथी त्याची जळो ही लाचारी "
शेवटी कविसंमेलनाध्यक्ष रवींद्र जाधव यांनी समारोप करताना वास्तव चीत्र रेखाटणारी कविता सादर करून दाद मिळवली.
तब्बल तीन तास चालेल्या काव्य मैफिलीत कवयित्री उर्मिला परभणकर, सिमा नरवाडे, वंदना तामगाडगे, अर्चना गरुड, विजया तारु, कवी राजेंद्र चारोडे, मुकुंदा अभंगे, महेंद्र नरवाडे, राजेश गोलकोंडावार, राजेश पाटील, रामस्वरूप मडावी, सूर्यभान खंदारे, रणजीत वर्मा, श्याम राठोड, माधव बोईनवाड, मुनेश्वर थोरात, उत्तम पवार, अर्चना गरुड, सुमेध भवरे, धनंजय गिरे, सुरेशकुमार शेरे, संतोष पहुरकर, सुरेश पाटील, मिलिंद कंधारे, सागर चेक्के, परमेश्वर कुसुमवाड, मोहन जाधव, शेषराव पाटील, रमेश मुनेश्वर आदी कविनी एकापेक्षा एक कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास बहुसंख्य श्रोते उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .