सांगली ( शालेय वृत्तसेवा ) :
बालरक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय शाळास्नेही बालरक्षक पुरस्कारासाठी सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील जि. प. शाळा दहिवडीचे प्राथमिक शिक्षक श्री अजय काळे निवड झाली आहे.
सदर पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. राणी खेडीकर. उपाध्यक्ष विनोद राठोड, सचिव नरेश जाधव प्रसेनजित गायकवाड व मनोज चिंचोरे यांनी नुकतीच केली आहे.
दि. ३ एप्रिल २०२१ रोजी मुंबई येथील आचार्य कॉलेज सभागृह चेंबूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिका मा. डॉ. विजयाताई वाढ, बाल साहित्यिक श्री राजीव तांबे, ज्येष्ठ अभिनेते श्री दिलीप प्रभावळकर, सिने अभिनेत्री व कवयित्री डॉ. निशिगंधा वाढ, SCERT पुणे चे संचालक मा. श्री दिनकर टेमकर , उपसंचालक मा. कमलादेवी आवटी मॅडम या मान्यवरांच्या बरोबर सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात येणार आहे.
श्री काळे यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबवलेले विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, NCERT नवी दिल्लीचा मिळालेला नॅशनल ॲवॉर्ड फॉर इनोव्हेशन हा पुरस्कार, लेखन कार्यात असलेले कार्य व बालरक्षक चळवळीत दिलेले योगदान याचा विचार करून त्यांची निवड केल्याचे बालरक्षक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व सचिव यांनी सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
"हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून बालरक्षक चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येकाचा आहे. याच कार्यक्रमात प्रकाशित होणाऱ्या "एका साध्या समतेसाठी" या पुस्तकात माझ्या लेखाचा केलेला समावेश ही बाब माझ्यासाठी अभिमानास्पद आहे."
- अजय काळे


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .