भारत देशावर बरेच राजे,महाराजे,सम्राट यांनी राज्य केले. त्यांच्या चांगल्या वाईट गुणांची साक्ष इतिहास आपल्याला देते.ते प्रसिद्ध सुध्दा झालेत. तरीही आपण त्यांची नावे सहज सांगू शकणार नाही.कारण ते इतिहास जमा झाले आहेत.
पण 'छत्रपती' हा एक शब्द जरी आपण उच्चारला, तर आमच्या अंगावर स्फूर्तीचे शहारे उभे राहतात. आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. आज तीनशे- साडेतीनशे वर्षानंतर सुध्दा शिवरायांबद्दल आपल्या मनात एवढा आदर, आपुलकी आणि प्रेम आहे,हे विशेष. याचे खरे कारण आहे ते म्हणजे छत्रपती शिवरायांचे गौरवशाली कर्तृत्व,त्यांचे मानवकल्याण विषयी कार्य, त्यांचे मानवतावादी विचार, शेतकरीहीत, आणि त्यांचे मानव केंद्रित शासन हे होय. असा लोकराजा निर्माण होण्यासाठी त्यांना बहुमोल सुसंस्काराचा वारसा लाभला होता आणि तो म्हणजे त्यांची आई राष्ट्रमाता जिजाऊ यांचा. तर शिवरायांच्या कार्याचा हाच वारसा पुढे चालू ठेवणारा युवराज होय, राष्ट्रमाता जिजाऊंचा नातू आणि शिवरायांचे राजपुत्र संभाजी राजे भोसले.
आज 14 मे संभाजीराजे भोसले यांची जयंती आहे. आपण हा सोहळा हर्षोल्हासात जगभरात साजरी करत आहोत. महाराणी सईबाई आणि शिवाजीराजे भोसले या सुसंस्कृत राजघराण्यातील दांपत्याला सन 14 मे 1657 रोजी सुपुत्र जन्माला आले. आणि हाच राजकुमार पुढे शंभू राजे भोसले म्हणून नावारूपास आला. पण काही दिवसातच महाराणी सईबाई यांचे निधन झाले. आणि शंभूराजे यांच्या संगोपनाची जबाबदारी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यावर पडली. जिजाऊ म्हणजे रत्नांची खाण म्हणावे. किती योगायोग आहे कारण त्यांनीच स्वराज्याचा संस्थापक शिवबा घडविला आणि शंभू राजांना घडविण्याचे श्रेय सुद्धा त्यांनाच जाते.
राष्ट्रमाता जिजाऊ या सर्वगुणसंपन्न होत्या.कारण त्याही राजघराण्यातीलच राजकन्या होत्या. त्यांनी आपली राजधानी बसवताना ग्रंथ, ग्रंथालय, पंडीत यांना प्रचंड महत्त्व दिले होते. त्यांनी स्वतः राज्य कारभार चालविला. म्हणून सर्व गोष्टींचा त्यांना अनुभव होता. त्या निपक्षपाती न्याय निवाडे करत असत. ह्या वेळेस बाळ शंभूराजे सोबत असत. त्या अभ्यासू आणि विद्वान होत्या. जिजाऊ म्हणजे फार मोठे ज्ञानपीठच होते. आणि याच ज्ञानपीठातून शिवराय ही घडले आणि शंभुराजेही घडले.
शिवराय राजकारणात व्यस्त असताना जिजाऊंनी शंभूराजेंच्या सर्व शिक्षणाची व्यवस्था केली. जिजाऊ आणि शिवराय यांनी बाल शंभुराजे वयाच्या आठव्या वर्षी असतानाच त्यांना भाषाज्ञान,विज्ञान, राजनीति,गणिती,राज्य शासन, राज्य प्रशासन, कला, साहित्य ,संस्कृती, धर्म ,धर्मतत्वे,तत्त्वज्ञान, इतिहास, भूगोल, परंपरा, लोकराज्य, समाजशास्त्र शेती ,शेतकरी,खगोलशास्त्र, नाट्य, संगीत, इत्यादी क्षेत्रात पारंगत केले. एवढेच नाही तर त्यांना वयाच्या आठव्या वर्षीच सुमारे अकरा भाषा ज्ञात होत्या. असे जाणकारांचे मत आहे. त्यामध्ये मराठी, हिंदी, भोजपुरी, संस्कृत, फारशी, ईंग्रजी, कन्नड, तेलगू, पोर्तुगीज, अरबी आणि उर्दू ईत्यादी होय.
वयाच्या 14 व्या वर्षी राज्य कारभार बघत मोठा अनुभव घेत असताना शंभूराजेंनी 'बुधभूषण' हा राजनीतीवर आधारित संस्कृतमध्ये हा महान ग्रंथ लिहायला सुरुवात केली. हा ग्रंथ शिवराज्याभिषेकानंतर पूर्ण झाला. याशिवाय भोजपुरी हिंदी मध्ये 'नायिकाभेद' 'नखशिखा' आणि 'सातसतक' हे ग्रंथ पूर्णत्वास नेले . शंभुराजे हे प्रतिभावंत साहित्यिक, होते, ते मोठे धर्म चिकित्सक होते. तसेच ते संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक होते. काशी येथील पंडीत गागाभट्ट यांनी संभाजीराजे यांचे वर 'समयनय' नावाचा संस्कृत ग्रंथ लिहून त्यांना अर्पण केला. यावरून संभाजी राजांच्या विद्वतेविषयी आपणास लक्षात येईल.
संभाजी राजांनी पुरातन साहित्य ब्राह्मी, पाली व पाकृत भाषेतील जैन- बौध्द तत्त्वज्ञानाचाही त्यांनी अभ्यास केला. या अल्पवयीन राजपुत्राने विश्वाला आश्चर्याचा धक्का दिला.ते म्हणजे 14व्या वर्षी 'बुधभूषण' हा 883 श्लोक असलेला महान ग्रंथ होय. याची एकूण तीन भागात अध्यायात विभागणी केली आहे. पहिल्या भागात 194 अध्याय, दुसऱ्या भागात 630 अध्याय, तर तिसऱ्या भागात 59 अध्याय अशी एकूण 883 श्लोक आहेत.
पहिल्या अध्यायामध्ये शिव कुळांचा सांस्कृतिक वारसा, स्वकुळ भोसले कुळांची महान परंपरा, संस्कृती बद्दलचा आदर, आणि शिव संस्कृतीचे गुणगान केले आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये शंभुराजांनी सात दोष सांगितले आहेत. जे राजासाठी शत्रू समजले जातात.
ते पुढीलप्रमाणे आहेतः
कोणालाही टोचून बोलू नये, कुणाशीही कठोर बोलू नये, संरक्षणाशिवाय राजाने राज्यापासून दूर जावू नये, राजाने मादक द्रव्य, दारू, अफू गांजा यांचे सेवन करू नयेत, राजाने परस्त्रीचा माते समान सन्मान करावा, राजाने गरीब, जंगली आणि पाळीव प्राण्यांची हत्या करूच नये, आणि राजाने द्दुत- जुगारा पासुन दूर रहावे.(श्लोक-422)
संभाजी राजेंनी ग्रंथलेखन करून साहित्य क्षेत्रातील मक्तेदारीला सुरुंग लावला. एवढेच नाहीतर साहित्य लेखन करतांना त्यांनी आपल्या कर्तव्याकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. शिवरायांच्या पश्चात संभाजी राजांनी स्वराज्याचे रक्षण केले. प्रजेला न्याय दिला. गोरगरिबांचे रक्षण केले. संभाजी राजांनी पोर्तुगीजांना पराभूत केले व त्यांच्याशी तह केला. तर शंभू राजाने त्यांच्या आयुष्यात अडीच हजार लढाया केल्या. निद्रेचे चार तास सोडले तर सतत वीस तास अखंड नऊ वर्षे संभाजी राजांनी डच, ईंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी, मोगल आणि अदिलशाहा यांचा प्रतिकार केला. त्यांनी आपल्या सैनिकांची काळजी घेतली. त्यांच्या सुखदुखात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे रहायले. सैनिकांना दुखापत झाली तर स्वतः त्यांनी त्यांच्या वर औषधोपचार केले. स्त्रियावर अत्याचार करणारास कठोर शिक्षा केल्या. तेवढाच त्यांच्या अंगी प्रेमळपणाही होता. त्यांनी स्वराज्यातील व घरातील सर्व स्त्रियांना आदराने वागविले. ताराराणी आणि येसूबाई यांना राजकीय निर्णयाचे स्वातंत्र्य दिले. सर्व सावत्रमातांना शेवटपर्यंत त्यांचा प्रेमाने सांभाळ केला. संत तुकाराम महाराजांची पत्नी व मुले यांची देहूला जावून विचारपूस केली.
म्हणूनच संभाजी राजाची किर्ती सातासमुद्रापार गेली
होती. त्यांना जितका आपल्या देशात बहुमान होता तितकाच बाहेर देशातही त्यांचा बहूमान होता. संभाजी राजे मानवतावादी राजे होते. ते प्रजेसाठी जगणारे राजे होते.त्यांचे प्रशासन हे माणूस केंद्रीत होते. जनतेच्या कल्याणासाठी ते कार्य करायचे.त्यांनी त्या काळात लोकशाही प्रणालीचा अवलंब केला. समता, बंधूता ,स्वातंत्र्य आणि न्याय देवून राष्ट्राचा विकास केला. आणि हाच लोकशाहीचा अधिकार आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून तो आम्हाला दिला. शेतकरी हा अन्नदाता आहे. त्यांचा त्यांनी आदर केला. शेतकरी आणि सैनिक यांना महत्त्व दिले. त्यांनी शेतकऱ्यांना सवलती दिल्या. त्यांना प्रचंड प्रोत्साहन दिले. सावकार शाही बंद केली. हे करीत असताना त्यांची सहचारिणी मागे नव्हती.महाराणी येसूबाई रयतेच्या सुख-दुःखात सहभागी होवून प्रजेच्या समस्या जाणून घेत. शेतकरी, कष्टकरी, कलाकार, कारागीर , या सर्वांना त्यांनी समतेने वागवले त्यामुळे सर्व प्रजा संभाजी राजेवर जीवापाड प्रेम करत असे.
आपले प्रेरणास्थान म्हणून शंकर, पार्वती, श्रीकृष्ण यांनाही त्यांच्या मनात आदराचे स्थान होते. त्यांच्या वर त्यांनी कवनेही लिहिली. शंभूराजेंनी यांच्या विचारधारेवर भगवान बुद्ध, संत रोहिदास, संत नामदेव ,संत तुकाराम यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव दिसतो.
शंभूराजेंनी समाजव्यवस्था परिवर्तनासाठी ब्राह्मण हा शब्द जात वाचक न मानता गुण वाचक मानला. भगवान बुद्धाने 'ब्राह्मणवग्गो' या धम्मापदातून ही संकल्पना स्पष्ट केली आहे. हाच सदगुण आपल्या ग्रंथातून अध्याय 26 मधून प्रस्तुत करुन यावर 40 श्लोक लिहिले आहेत.
संभाजी राजे हे' बुधभूषण' हा ज्ञानाचा महासागर आपल्या पुढे ठेवून ते म्हणतात ,दुधाचा सागर मी तुमच्या समोर भरून ठेवला आहे, जे चांगली असेल ते तुम्ही घ्या आणि वाईट ते माझ्यासाठी ठेवा..(अध्याय1श्लोक क्र.17)
हा महान ठेवा आजच्या युवांसाठी प्रेरणादायी, आशा दायी,विज्ञानदायी,प्रयत्न वादी आणि यशदायी आहे. आणि हाच समाज परीवर्तनशील मार्ग आहे.
आज दिनी शंभूराजेंची ही वैचारीक मशाल आम्ही हाती घेतली पाहिजे. आणि यातून स्वतः चा विकास साधून देश विकास केला पाहिजे.
'चला धरु एकतेची कास
होईल देशाचा विकास'
शंभूराजेंना जयंती दिनी कोटी कोटी प्रणाम...
-बाबुराव पाईकराव
डोंगरकडा.
9665711514



आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .