रंगकर्मींच्या उपक्रमाचे होते कौतुक !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
विद्यार्थी आणि पालकांन शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा हे कलागुण सुद्धा जोपासले पाहिजे, विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा विचार न करता धैर्याने, जिद्दीने आपल्या जीवनातील संकटाचा सामना करावा कारण दुर्लक्षित विद्यार्थीच आपल्या जीवनात उत्तुंग यश मिळवू शकतो याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. रंगकर्मीचे कार्य विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे आहे. असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले.
किनवट येथील पंचायत समिती सभागृहात शिवजयंतीचे औचित्य साधून रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान, उदगीर जिल्हा लातूर यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय रंगभरण चित्रकला व निबंध स्पर्धा बक्षिस वितरण कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उप विभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे, माजी उप सभापती गजानन कोल्हे, गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने, शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, भाजपा तालुकाप्रमुख संदीप केंद्रे, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार, माजी पंचायत समिती सदस्य निळकंठ कातले , डॉ.शिरीष पत्की, शिक्षक नेते नरसिंग एंड्रलवार, कपिल रेड्डी उपस्थित होते.
संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील 76 शाळेतील 3500 विद्यार्थी सहभागी झाले होते. तालुक्यातून 12 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय, तृतीय व 30 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली.
छत्रपती शिवाराय व राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पार्पण केल्यानंतर सुभाष पडलवार यांनी ' जय जय महाराष्ट्र' हे राज्यगीत गाईले. संस्थेचे उपाध्यक्ष मारोती भोसले यांनी मान्यवरांचे फेटा, शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, देऊन मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रशेखर सर्पे यांनी आभार मानले.
रंगकर्मीच्या कार्याची दखल घेत आमदार भीमराव केराम यांनी मारोती भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी मनीषा मारोती भोसले यांचा सत्कार केला.
याप्रसंगी मागदर्शन करतांना उप विभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे असे म्हणाले की, "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना राज्यस्तरीय बक्षीस वितरण करीत आहोत ही एक अभिमानाची बाब आहे. याहीपुढे असे सामाजिक जाणीवेचे विविध उपक्रम राबवावे. विद्यार्थ्यांनी कधीही खचून न जाता कठोर मेहनत केली तर यश नक्कीच मिळते. या जगात मेहनत केली तर कुठलीच गोष्ट अशक्य नसते. असेही ते म्हणाले."
यावेळी गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने आपल्या मनोगतात म्हणाले, "आपण जर स्वतःशी कधीही हरणार नाही असा संकल्प केला. आयुष्यात कधीही खचून न जाता सतत प्रयत्न करत राहिले तर यश नक्कीच तुम्हाला मिळेल. रंगकर्मीचे सात वर्षांपूर्वीचे कार्य रोपटे आज महाराष्ट्रभर वटवृक्ष झाले आहे".
कार्यक्रमाच्या यशसस्वितेसाठी सुनील लासुरे, अश्वत घुले व पंस शिपाई मडावी यांनी परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .