पहिलीपासून सैनिकी शिक्षणाचे धडे.. दादा भुसे यांची 'यिन'च्या समर युथ समिटच्या समारोपप्रसंगी घोषणा !

शालेयवृत्त सेवा
0

 



पहिलीपासून सैनिकी शिक्षणाचे धडे.. दादा भुसे यांची 'यिन'च्या समर युथ समिटच्या समारोपप्रसंगी घोषणा !



नाशिक ( शालेय वृत्तसेवा ) :

 "विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण व्हावी, 'नेशन फर्स्ट' हा विचार रुजविण्याच्या उद्देशाने इयत्ता पहिलीपासूनच सैनिकी शिक्षणाचे प्राथमिक स्तरावरील प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जातील. माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, एनसीसी, स्काउट-गाइडचे शिक्षक हे विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे धडे देतील," अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी रविवारी केली.


'सकाळ' माध्यम समूहाच्या 'यिन' व्यासपीठाद्वारे आयोजित 'समर युथ समिट २०२५' या दोन दिवसीय निवासी शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.



भुसे म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभुराज देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल. नुकतेच जिल्हा परिषदेच्या ४८ शिक्षकांना सिंगापूर येथे अभ्यास दौऱ्यासाठी पाठविले होते. तेथील शिक्षण व्यवस्थेमध्ये 'राष्ट्र प्रथम' ही संकल्पना असल्याचे शिक्षकांनी सांगितले. महाराष्ट्रामध्येही शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल करत असून, शिक्षणातून देशप्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात बदल दिसून येईल."



विद्यार्थ्यांना उपचार सुविधा :


प्रत्येक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करताना 'हेल्थ कार्ड' तयार केले जाईल. तपासणीत काही आजाराचे निदान झाल्यास अशा विद्यार्थ्यांना उपचार सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.




मंत्री भुसे यांनी मांडलेले ठळक मुद्दे :


▪️'सीबीएसई' च्या धर्तीवर राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमात करणार बदल.


▪️राज्याच्या अभ्यासक्रमात 'सीबीएसई' मधील चांगल्या बाबी अंगीकारणार.


▪️१६ जूनपासून शैक्षणिक वर्षास प्रारंभ.


▪️शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री करणार स्वागत.


▪️खासदार, आमदार त्यांच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे स्वागत करतील.


▪️स्थानिक स्वराज्य संस्थांशी संलग्न शाळांचा दर्जा सुधारणार.


▪️वर्षभरात शालेय शिक्षणात राज्यव्यापी बदल दिसतील.




सहलींचे स्वरूप बदलणार..


मंत्री दादा भुसे म्हणाले, "शालेय विद्यार्थ्यांची सहल शेतकऱ्यांच्या बांधावर नेली जाईल. बळिराजा कशा प्रकारे कष्टाने पिकवतो, याची जाणीव त्यांना या माध्यमातून होईल. तसेच सहल बँकेत, रुग्णालयासह इतर विविध ठिकाणी नेताना तेथील व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाईल. गड-किल्ल्यांवर नेताना गौरवशाली इतिहासाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविली जाईल."

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)