गावमाती अन् माणसातील स्थित्यंतर टिपणारी कविता : ' एका वादळाच्या प्रतिक्षेत '

शालेयवृत्त सेवा
0

 



   मराठी भाषेत आज खूप मोठ्या प्रमाणावर काव्य निर्मिती होत आहे. वर्तमानात कवितांचे पीक कुठेही खुरट्या डोंगरावर, रानावनात वारेमाप उगवत आहे. अशाच गाळघळाठ्याच्या काळात अनुभवाचं मोठं संचित जवळ असलेले काही ‌कवी, काव्यनिर्मितेची जाण व वास्तवाचे भान सजग ठेवून लेखन करताना दिसत आहेत. त्यातील आवर्जून नाव घ्यावे असे कवी म्हणजे बालाजी तुमवाड हे आहेत.


     ‌बालाजी तुमवाड  हे एक सच्चे, उपक्रमशील शिक्षक आहेत. ते जसे शाळेत संस्काराचे धडे देतात आणि भावी पिढीला घडवण्याचे महान काम करतात. तसेच ते लोकशिक्षक होऊन समाजाकडेही अगदी डोळस नजरेने पाहतात. समाजाला मूल्यात्मक मार्गावर नेण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. ते फक्त बोलून थांबत नाहीत, तर शब्दांना कृतीची जोड देत 'सेवा समर्पण प्रतिष्ठान ' च्या माध्यमातून कृतीशील समाजकार्य करतात.


      कवी बालाजी तुमवाड यांचे मागे २०२१ मध्ये 'तुका झाला खोटा' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर आता नांदेड येथील सुप्रसिध्द इसाप प्रकाशनाने प्रकाशन सिद्ध केलेला 'एका वादळाच्या प्रतिक्षेत' हा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. या  पुस्तकाचे मुखपृष्ठ पुणे येथील सुप्रसिद्ध रंगकर्मी संतोष घोंगडे यांनी केलेले असून, काही थोडे कच्चे धागे वगळता, प्रकाशक दत्ता डांगे यांनी आपल्या सृजनशील नजरेने हे पुस्तक सर्वांगसुंदर  बनवलेले आहे. स्वतः प्रकाशकांनीच पुस्तकाच्या मलपृष्ठावर अभिप्राय देऊन पुस्तकाची उंची वाढवलेली आहे.


      ‌ बालाजी तुमवाड यांची कविता विविधांगी आहे जीवनाच्या बहुतेक अंगाला ती स्पर्श करत पुढे जाते.


आजवर मराठी भाषेचे कौतुक करणार्या अनेक कविता, गीते, लिहिली गेलेली आहेत. त्यासाठी संत ज्ञानेश्वर,  वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज), वि.दा करंदीकर, बा.शि. मर्ढेकर , सुरेश भट, वि.म. कुलकर्णी, संजीवनी मराठे यांची नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतात. त्यांच्याच मार्गावरून चार पाच पावलं चालतांना कवी बालाजी तुमवाड यांनी आपल्या 'शब्द मराठी' या कवितेत मराठी भाषेच्या सामर्थ्य स्थळांचे वर्णन केलेले आहे. ते म्हणतात..


किती चौफेर चौफेर

माझा मराठी सबूत

कोटी लेखणी भागल्या

त्याला पुरेना कागूद


    आज चौफेर पसरलेल्या या अभिजात मराठी भाषेचे सौंदर्य स्थळे आणि सामर्थ्य स्थळे असलेले संत ज्ञानोबा- तुकोबा पासून इंद्रजीत भालेरावांपर्यंत, जनाई पासून बहिणाबाई पर्यंत, पट्टे बापूराव पासून सुरेखा पुणेकरांपर्यंत तिच्या सारस्वत पुत्रांनी मराठी भाषेचे वैभव कसे वाढविलेले आहे. त्याचे सुंदर वर्णन कवीने केलेले आहे. त्या बद्दल कवीने त्यांच्या विषयी कृतज्ञताही व्यक्त केलेली आहे.


कविता कशी जन्माला यावी याविषयी कवीची एक स्वतंत्र धारणा झालेली आहे. ती धारणा 'कविता' या रचनेतून अभिव्यक्त होतांना दिसून येते. ते म्हणतात...


अशी जन्मावी कविता

वाहे जसा झरा जिता

नको नको बळजोरी

यमकाशी जुळविता


      या जाणीवेतून त्यांची कविता कागदावर उतरते. नेणीवेतून प्रांतातून इतक्या सहजतेने जाणीवेच्या अंगणात कविता रांगत रांगत येत, ती दृश्य रूपात कागदावर अवतरली पाहिजे असा आशावाद कवी व्यक्त करतो.


  कवी बालाजी तुमवाड यांची कविता म्हणजे, अस्सल ग्रामीण जीवनानुभवांची अभिव्यक्ती आहे. त्यांच्यावर बऱ्याच पूर्वसुरी कवींचा प्रभाव पडलेला आहे. त्यासाठी कृष्णाजी केशव दामले (केशवसुत), ना.धो. महानोर, सुरेश भट, इंद्रजीत भालेराव, बहिणाबाई चौधरी, विठ्ठल वाघ अशा कुलवंत कवींचे नाव घेता येईल. म्हणून त्यांच्या काही कविता या  व्यक्तीविषयी  उद्दातीकरण करणार्या आहेत. 'माय बहिणाबाई चौधरी' 'इंद्रजीत भालेराव' 'लता मंगेशकर' यांच्या कार्याने प्रभावित होऊन कवी त्यांच्या विषयी कवितेतून कृतज्ञता व्यक्त करतो. 


      हा कवी शेतकरी, कास्तकर्यांच्या सामान्य कुटुंबातून आलेला असल्यामुळे गाव- गावपांढरी, शेती-माती, या विषयीची अनुभव श्रीमंती त्यांच्याकडे विपुल प्रमाणात आहे.पाढरपेशा वर्गातील सुखाच्या कल्पना ह्या काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना कधी स्पर्शही करत नाहीत. रात्रंदिवस पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी घामाचे सिंचनकरणार्यांकडे तेवढी उसंत आहेच कुठे..? 


    शेती आणि मातीत खपणा-या माणसचं दुःख व्यक्त करणं हा कविच्या कवितेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकऱ्यांच्या दुःखाचे वर्णन करताना कवी त्यांच्या दैनीय परिस्थितीचे वर्णन करतो. रात्री-बेरात्री शेतात जाताना विंचूकिडा, साप यांची तमा न बाळगता शेतकरी राना-वनात हिंडतो. ओल्या पायात  हेकळनांचा काटा जेव्हा शेतकऱ्याच्या पायात शिरतो तेव्हा होणारी वेदनेने टणक काळजापर्यंत जाणारी असते. हे सगळं दुःख त्यांच्याच वाट्याला आलेलं असतं, हे सांगताना कवी म्हणतो,


घाण्याच्या बैलाचे जीवन

मर्यादा चाकोरी रिंगणाची

डिरकणाऱ्या खोंडानाच का 

मुभा असे झिंगण्याची ?


वचनामधले आम्ही पोशिंदे

वंचित जगती आलो

पोट जगाचे भरता भरता

आम्ही कुपोषित झालो


   ही कास्तकारांची सलणारी वेदना आहे. कथा, कविता, कादंबऱ्यात जगाचा 'पोशिंदा' म्हणून  त्याच्या जीवनाचे चित्रण केले जाते. पण तोच शेतकरी आज दैन्यवाणा होऊन कुपोषितांचे जीवन जगतो आहे. हे विपरीत जगणे त्याच्याच भाळी का आलेले आहे.   असा प्रश्नही व्यवस्थेला विचारण्याचे धाडस बालाजी तुमवाड यांची कविता करते.


     प्राचीन काळापासून भारतातील खेडे स्वयंपूर्ण होती. गाव खेड्यातील गरजांची पूर्तता ग्रामजीवनाला प्रवाहीत ठेवण्याचे काम 'बलुतेदारी' नावाच्या व्यवस्थेने केलेले होते. ही व्यवस्थाही फार चांगली होती असे नव्हे, तिच्याही काळजात विषमतेची आग धगधगती होती. बलुतेदार कष्टक-यांचा स्वाभिमान पायदळी तुडवून समाजातील ठग्याटोणग्यांनी केलेले अन्याय, अत्याचार व अपमानाचे घाव ही व्यवस्था नित्य सोसतच होती.  अशा बिकट अवस्थेतही आपल्या भळभळणाऱ्या असंख्य जखमांना सावरत ग्रामजीवनाच्या उत्कर्षासाठी  गावपंढरीची श्रमाने पुजा करणारा बलुतेदार आज देशोधडीला लागलेला आहे. आजच्या 'खाऊजा' सारख्या व्यवस्थेतून निर्माण झालेल्या अजस्त्र आधुनिक यंत्रदानवाने  तिला पूर्णपणे गिळंकृत केलेले आहे. याची अतिशय सक्षमपणे सर्वस्वी जाणीव 'बलुतेदारी' या कवितेतून बालाजी तुमवाड यांनी करून दिलेली आहे.


     वर्तमान आधुनिकीकरणातून गावपांढरीचे सारे रूपच पालटून गेलेले आहे. या यांत्रिकीकरणामुळे शेतीची जुने अवजारे तिफण,मोगडा,चाडे, खुरपं सारं संपत गेले, सणावारांचे रूप पालटत गेले, चिखलमातीतून बनवलेली बैल जाऊन, तेथे परदेशी चिनी मातीचे बैल आले. बलुतं गेले, बुलुतेदार गेले. उसनं-पासनं‌ गेलं, पारावर बसनं-हसणं गेले हे सारे  बदललेलं सोसतांना वृद्धमाणसांच्या चेहर्यावर उदासीनतेची छाया पसरली गेली. आमचा औत मोडला तेव्हा हे दुःख सहन न झाल्याने कवीचे वडील उपरण्याआड रडले होते. यांची खंत कवी मनाला आजही सतावते आहे. या परिवर्तनाच्या त्सुनामीत सारे गावपण नामशेष होत आहे. त्यात ग्रामसंस्कृतीचे  सर्वस्व संपते की काय, ही धास्ती कवीला वाटते. शेवटी आधुनिकीकरण आणि भांडवलशाहीच्या कचाट्यातून वाचण्यासाठी कवी व्यवस्था आणि ईश्वराकडून काही माफक अपेक्षा करतो. तो  म्हणतो...


देवा माझीबी लेकरं

दोन अक्षरं शिकावी

गरिबांच्या पोरासाठी

शाळा मराठी टिकावी


..कारण, गरीब कास्तकरी शेतकऱ्यांना स्वतः च्या लेकरांना महानगरांतील कार्पोरेट शाळेत शिकवणं शक्य होत नाही. त्यांना हवी असते मोफत शिकवणारी झेड पी ची मराठी शाळा, ती टिकली पाहिजे अन् गोरगरिबांची लेकरं शिकली पाहिजे यासाठी कवी ईश्वरांकडे पसायदान मागतो.


   जीवन ही एक परीक्षा आहे. येथे प्रश्न कधीच संपत नसतात. कधी ते प्रश्न आपल्या नात्यातून निर्माण झालेले असतात. तर कधी नात्याबाहेरील वर्तूळातून निर्माण झालेले असतात. अशा माणूस आता बाहेरूनही कोसळतो. त्यांवेळी त्यांनी रंगवलेले स्वप्न दूरदूर अन् जीवन बेसूर  दिसायला लागतं. मग अशावेळी प्रसंगी त्यांच्यावर मात करण्याचे बळ पुरवणारा कृष्णासारखा एखादा मित्र असावा असे कवीला वाटत राहते. कारण मित्र वणव्यात गारव्या सारखा असतो. मनःशांतीचं एकमेव सुखदं ठिकाण असतो. त्यासाठी या मायावी भवजालातून सोडविणारा एकमेव 'सखा' कोणी असेल, तर तो कर कटेवर ठेवून अठ्ठावीस युगांपासून वीटेवर उभा असलेल्या पांडुरंगच आहे. यांची कवीला जाणीव होते.  म्हणून कवी विठ्ठलाच्या  नावाने अभंगातून गाऊ लागतो..


जेव्हा पडे नजरेस, मूर्ती सावळी धाकुटी,

ध्येय, ध्याता,ध्यान, झणी मावळे त्रिपुटी,


तुझ्या नामात गुंतता, मनी आनंदाचा डोह

जीव होय वारकरी, दूर पळे माया मोह

        त्या विठ्ठलाच्या सावळ्या मूर्तीचे दर्शन हेच भक्तांची संजीवनी आहे. तोच अंतरिच्या कोलाहलाचा सर्वनाश करून निर्विकल्प मुक्तीचा दाता आहे. नाम संजीवनी सोपे साधन भक्ताकडे आहे. त्यांच्या सामर्थ्याने जीवनातील षड्ररिपू वर विजय मिळवता येतो. असा दृढ विश्वास निश्चितच बालाजी तुमवाड यांच्याकडे आहे.


    कवी बालाजी तुमवाड यांची कविता गावमाती आणि माणसांच्या स्थित्यंतराची काळजातील स्पंदने टिपत राहते. माणसांना शेती, माती, नाती, संस्कृती, यांच्यासह शिक्षण आणि मानवीय मूल्यांची महती सांगते. ती शाश्वत मूल्ये समाजात रूजली पाहिजे यासाठी सदैव धडपडते. ही‌ कुलवंत मराठी कविता वाचकांच्या मनाला निश्चितच मोहणी घालते. कवी बालाजी तुमवाड यांची लेखणी, हे नैतिकतेचं बळ घेऊन सदैव पाझरत राहो..!  या सदिच्छेसह त्यांना भावी  लेखनकार्यासाठी खूप खूप शुभेच्छा..!


__'एका वादळाच्या प्रतिक्षेत' (काव्यसंग्रह) 

__कवी : बालाजी तुमवाड 

__ इसाप प्रकाशन, नांदेड

__मुखपृष्ठ: संतोष घोंगडे, पुणे

__ मूल्य: २०० रू.

__ पुस्तक परिचय: बाबाराव विश्वकर्मा (नांदेड)

                            भ्रमणध्वनी: ९४०३४१८७१८

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)