राज्यभरातील शिक्षकांना धर्मवीर आनंद दिघे कॅशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य कवच योजना लागू होणार..
सोलापूर ( शालेय वृत्तसेवा ):
राज्यभरातील शिक्षकांना धर्मवीर आनंद दिघे कॅशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य कवच योजना लागू होणार आहे. आरोग्य विभागाने या योजनेस तत्त्वतः मान्यता दिली असून, उच्चस्तरीय समितीही स्थापली आहे. आतापर्यंत केवळ पूर्ण अनुदानित शाळांमधील शिक्षकांनाच वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभमिळत होता. मात्र, अंशतः अनुदानित शिक्षकांनाही आता या योजनेचा लाभहोणार आहे.
महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याची घोषणा झाली असली, तरी त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही. या योजनेसाठी आरोग्य सेवा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे, जी अहवाल सादर करेल. ही योजना मुंबई उच्च न्यायालय, गृह विभाग व विक्रीकर विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच इतर कर्मचाऱ्यांसाठीही कॅशलेस वैद्यकीय सेवा योजना सुरू करण्याच्या धर्तीवर आणली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.
बिल मंजुरीसाठी खेटे नाही मारावे लागणार...
आता शिक्षकांना उपचार घेतल्यावर त्याची फाइल सबमिट करावी लागते. त्यानंतर बिल मंजूर झाल्यानंतर पैसे मिळतात. यासाठी तीन ते चार महिने कालावधी लागतो, वेळ पडल्यास शिक्षकांना हेलपाटे मारावे लागतात, मात्र कॅशलेस योजना मंजूर झाल्यानंतर शिक्षकांना बिल मंजुरीसाठी खेटे मारावे लागणार नाही. या योजनेतून थेट कॅशलेस उपचार शिक्षकांवर होणार आहेत. याचा मोठा फायदा शिक्षकांना होणार आहे.
तत्त्वतः मान्यता, समिती स्थापना... पुढे काय?
सोलापूर जिल्ह्यातील एवढ्या शिक्षकांना लाभ :
प्राथमिक विभाग - ४५८८
माध्यमिक विभाग - ५१२४
थेट शासन किंवा विमा कंपनी खर्च करणार :
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्यानंतर कॅशलेस योजनेचा खर्च थेट शासन करणार की विमा कंपनी करणार याबाबतचा निर्णय होणार आहे. आठ जणांची कमिटी त्याबाबतचा उल्लेख अहवालात करेल, असेही सांगण्यात आले.
येत्या आठवड्यात कमिटी स्थापन करण्याचा निर्णय होईल नवीन कमिटी राज्यभर फिरून लोकांशी संवाद साधेल योजनेच्या लाभाविषयी, त्याच्या फायद्याविषयी माहिती घेईल त्यानंतर कमिटी एक अहवाल शासनाकडे सादर करेल त्या अहवालावरून शासन कॅशलेस योजनेस मंजुरी देईल.
"धर्मवीर आनंद दिघे कॅशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य कवच योजनेसाठी मी स्वतः पाठपुरावा करीत आहेत. नुकतेच मुख्यमंत्र्यांनाही शिक्षकांच्या प्रमुख मागण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. आतापर्यंत प्रवासात चांगले यश आले आहे, येत्या महिन्याभरात योजनेचा सविस्तर शासन निर्णय निघणार आहे. या निर्णयाचा राज्यातील शिक्षकांना मोठा फायदा होणार आहे.
-मंगेश चिवटे, शिक्षकदूत
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .