28 फेब्रुवारी : राष्ट्रीय विज्ञान दिन..

शालेयवृत्त सेवा
0


            


28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला. तेव्हा पासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. 


भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात.काही दिवसांपूर्वी भारताने संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारे काम करून दाखवले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाचवेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडून नवा विश्व विक्रम केला आहे. 

21 वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे मानले जाते आणि ते खरे ठरत आहे. कारण आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर या विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत चाललेली आपणाला दिसते आहे. नवनवीन यंत्रे, तंत्रज्ञान हे बदल सर्व विज्ञानामुळे होत आहेत. आपल्या समाजामधील ज्या अंधश्रद्धा होत्या त्या विज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत आणि हे एक चांगल्या प्रगतीचे लक्षण मानले जाते.

आता आपण विज्ञानावर एवढे अवलंबून आहोत की, आपल्याला पहाटे उठण्यासाठी होणारा गजर म्हणजे घड्याळ हे सुद्धा एक विज्ञानाच्या प्रगतीचे छान उदाहरणच आहे. आपली संपूर्ण दिवसाची दिनचर्या आपण या छोट्याशा मशीनमुळे योग्य वेळेत पूर्ण करतो आणि त्याचा फायदा सर्वांना होताना दिसत आहे.


1999 पासून भारत देशात विज्ञान दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना राबविल्या जातात. यामुळे नवनवीन विषय तसेच विज्ञानामधील चांगले वाईट अनुभव किंवा पुढील काही वर्षाचे नियोजन आपण आतापासून करू शकतो आणि पुढील काळातील होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करू शकतो. 1999 मध्ये आपले विश्व बदलणे ही संकल्पना, 2004 मध्ये समुदायातील उत्साहवर्धक वैज्ञानिक जागृती ही संकल्पना तर 2013 मध्ये मॉडिफाईड पिके व अन्नसुरक्षा सुधारणा या संकल्पनेवर भर देण्यात आला.


चालू वर्षामध्ये 'खास विकलांग व्यक्तींसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवसाला अनेक ठिकाणी चांगले संभाषण, विविध संशोधने शास्त्रज्ञांची चर्चासत्रे अशा अनेक कार्यक्रमांनी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. आतापर्यंत विज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे मानव जातीला तसेच संपूर्ण सृष्टीला चांगला फायदा झाला आहे. नवनवीन ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि जीवन जगण्याचे, उदरनिर्वाह करण्याचे एक प्रगतीशिल साधन मिळाले आहे. त्याचा सामाजिक, आर्थिक, व्यावहारिक चांगला फायदा होत आहे.

आपल्याला ज्या सुखसोई आता उपलब्ध आहेत, त्या फक्त आणि फक्त विज्ञानामुळे आहेत आणि आपण भविष्यात काय घडवू शकतो हे सुद्धा विज्ञानच ठरवू शकते. भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना खूप खूप  शुभेच्छा....!





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)