डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांचे शैक्षणिक ग्रंथ प्रेम !
विद्यार्थीदशेत अभ्यासा व्यतिरिक्त ज्ञानवर्धक ग्रंथाच्या वाचनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिज्ञासू वाचक होत गेले. वाचलेली पुस्तके संग्रही असावीत असा त्यांचा कटाक्ष होता. वडील रामजीबाबा यांनी भीमरावांना बालवयातच वाचनाचा छंद जडावा व त्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून घर खर्चाला आवर घालून महत्त्वाची पुस्तके आणून देत असत.
डॉ. आंबेडकरांनी १९५१ च्या सप्टेंबर महिन्यात नेहरू मंत्रिमंडळातील कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांच्यापुढे एक मोठी अडचण होती ती म्हणजे मंत्र्यांचे निवासस्थान सोडून खासगी जागेत राहायला जावे लागणार होते. त्यात त्यांच्याकडील प्रचंड ग्रंथसंग्रह हा त्या छोट्याशा जागेत मावणारा नव्हता. तो त्यांना तेथून हलवावा लागणार होता. मग एवढा मोठा पुस्तकांचा संग्रह ठेवायचा कुठे? त्यामुळे ते थोडेसे अस्वस्थ झाले होते. त्यातील पुस्तकांचा मोठा भाग रेल्वेने मुंबई येथील 'राजगृह' या बंगल्यावर पाठवण्यात आला. मुंबईला राजगृह हे निवासस्थान डॉ. बाबासाहेबांनी स्वतः बांधले. आपल्या ग्रंथाची व्यवस्थित सोय व्हावी म्हणून त्यात अनेक वेळा बदल केला गेला. बांधलेला भाग पुन्हा पुन्हा पाडून आपल्या मनासारखा व्यवस्थित बांधल्या गेला. त्यात बाबासाहेब राहायला गेले. तेव्हा त्यांच्या सुसज्ज ग्रंथाचा हॉल हा एक महत्त्वाचा भाग ठरला. आणि त्यांनी आपल्या आवडत्या 'राजगृह' या निवासस्थानी बसून आपल्या ग्रंथालयातील ग्रंथाचा मनसोक्त लाभ घेत असताना त्यांना किती आनंद झाला असेल.
डॉ. बाबासाहेबांच्या स्वतःच्या खाजगी ग्रंथालयात ५००० कायद्याची, ३००० राजकारणाची, १३०० साहित्यावरची, २५०० इतिहासावरची, २००० धर्मावरची, हजारो अर्थशास्त्र, युद्धशास्त्र, तत्त्वज्ञान, मानववंशास्त्र, नीतिशास्त्र त्याशिवाय अनेक विषयावरची हजारो पुस्तकांचा संग्रह त्यांच्या या ग्रंथालयात होता. एकदा पंडित मदनमोहन मालवीय यांनी डॉ.बाबासाहेबांच्या राजगृहाला भेट दिली. तेव्हा भव्य आणि दिव्य ग्रंथसंग्रह पाहून ते चकित झाले. इतका महत्त्वाचा व प्रचंड ग्रंथ संग्रह हिंदू विश्वविद्यापीठात असावा अशी त्यांची इच्छा झाली. म्हणून ते डॉ.बाबासाहेबांना म्हणाले, "डॉ.आंबेडकर, हा आपला ग्रंथसंग्रह बनारस हिंदू विश्व विद्यापीठाला द्या. म्हणजे तेथील हजारो विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल. आणि त्या ठिकाणी आपले स्मारकही होईल. त्या बदल्यात विद्यापीठ आपणास दोन लक्ष रुपये देऊ करेल".
त्यावर डॉ. बाबासाहेब म्हणाले, "हे ग्रंथालय म्हणजे जनू माझे प्राणच आहे. हे ग्रंथ माझ्या पासून वेगळे करणे म्हणजे माझ्या कुडीतून प्राण काढून घेण्या सारखे होईल. मी त्यांच्या वाचून जगूच शकणार नाही. शेवटी डॉ.बाबासाहेबांनी हा आपला ग्रंथसंग्रह आपल्या आवडत्या सिद्धार्थ महाविद्यालयास दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लंडनहून आपले शिक्षण अपुरे सोडून भारतात परत यावे लागले तेव्हा चार वर्षात तो प्रबंध पूर्ण करून पाठविण्यासाठी खास परवानगी मिळाली होती. इंग्लंड मध्ये असताना त्यांनी एक वेळ उपाशीपोटी राहून पैशाची बचत करुन नव्या जुन्या पुस्तकांच्या अनेक दुकानातून हिंडून मोठ्या प्रमाणावर पुस्तके खरेदी केली होती. भरमसाठ पुस्तके आणि आपल्या सामानाची बांधाबांध करून ते सामान बोटीने भारतात पाठवून दिले. काही ऑफिशियल काम शिल्लक राहिल्यामुळे त्या बोटीने नं येता दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बोटीने भारतात येण्यास निघाले.
मुंबईत त्यांच्या घरी डॉ. बाबासाहेब येत आहेत ही बातमी कळताच आनंदी आनंद झाला झाला. इतक्यात लंडनहून भारतात येणारी बोट भूमध्य सागरात बुडाली. या बातमीमूळे एकच हलकल्लोळ उडाला. पण केवढे आश्चर्य, डॉ.आंबेडकर दुसऱ्या बोटीने मुंबई बंदरात येऊन पोहोचले. डॉ.बाबासाहेबांच्या जयघोषाने मुंबई बंदर हादरून गेले होते. सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. पण पुस्तकाची बोट बुडाली हे ऐकताच त्यांना खूप दुःख झाले. ते म्हणाले होते की, "मी माझ्या मुलाची जेवढी काळजी घेतली नाही त्यापेक्षा ह्या पुस्तकाची काळजी घेत होतो. दिवसातून एक वेळ उपाशी राहून खूप पायपीट करून हे ग्रंथ मिळवले होते."
माझा मुलगा राजरत्न गेला. त्या वेळेस मला जेवढे दुःख झाले होते, त्यापेक्षाही आज मला जास्त दुःख होत आहे". प्राणापेक्षा प्रिय असलेले शेकडो दुर्मिळ ग्रंथ त्या बोटी बरोबरच त्यांना जलसमाधी मिळाली. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. डॉ.बाबासाहेब मुंबईच्या सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स ऍण्ड इकॉनॉमिक्स या कॉलेज मध्ये प्रोफेसर म्हणून नोकरी करत असताना, रिकाम्या वेळे मध्ये कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन ग्रंथ वाचत बसत आणि महत्त्वाची टिप्पनेही काढत असत. एकदा कॉलेज मध्ये कार्यरत असताना त्यांच्या पगाराचा दिवस होता. रमाईला बाबासाहेब म्हणाले होते की, "अगं रामू आज माझा पगाराचा दिवस आहे". डॉ.बाबासाहेब खूप आनंदात आहेत हे पाहून रमाईला खूप आनंद झाला होता. आज साहेबांचा पगार आहे म्हणजे साहेब आपल्यासाठी नक्कीच नवीन साडी कपडे आणणार असा मनोमन विचार त्या करत होत्या. त्या संध्याकाळी त्या रस्त्याकडे एक टक लावून नुसत्या पहात होत्या.
तेवढ्यात डॉ.बाबासाहेब रमाई च्या नजरेस पडले. तेव्हा त्यांच्या सोबत एक त्यांचा सेवक होता. त्याच्या हातात एक लाल कपड्याचे गाठोडे होते. ते पाहून रमाई खूप आनंदित झाल्या. डॉ.बाबासाहेब घरात प्रवेश करून हात-पाय धूवून फ्रेश होऊन रमाईच्या समोर येतात तेव्हा रमाई विचारतात, "साहेब, आपण माझ्यासाठी नवीन कपडे आणलात ना?" डॉ.बाबासाहेब म्हणतात, "नाही ग रामू, मी बऱ्याच दिवसा पासून काही महत्त्वाचे ग्रंथ घ्यावे म्हणत होतो. पण पैशाच्या अभावामुळे ते घेऊ शकलो नाही. आज पगार हातात पडताच ग्रंथ खरेदी करून थेट इकडेच आलो बघ.
त्यावर रमाई फारच नाराज झाल्या. त्यांनी रमाईची नाराजगी दूर केली. असे ग्रंथाचे वेड असलेले डॉ.बाबासाहेब समाजासाठी तन-मन-धन अर्पण करणारे ग्रंथाची प्रचंड आवड असणारे डॉ.बाबासाहेब जगात प्रथम क्रमांकाचे विद्वान ठरले. डॉ.बाबासाहेबांना अनेक माणसे भेटण्यासाठी येत असत. कोणी सल्लामसलत करायला, तर कोणी सामाजिक विषयावर चर्चा करायला. तर कोणी नुसते दर्शन घ्यायला यायचे. डॉ.बाबासाहेब त्यांचे हसतमुखाने स्वागत करून त्यांच्या समोर बसायचे. त्यांना बोलत बोलत पुस्तकाशी एकरूप होत असत. त्यांच्या चर्चेत सहभागी होत असत. पण नजर पुस्तका वरील मजकुरावर असायची. त्यांना पुस्तकातून वेगळे करणे म्हणजे शरीराला प्राणांपासून वेगळे करण्या सारखे होईल असे वाटत होते.
नेहमी प्रमाणे रमाई बाबासाहेबांना जेवणासाठी बोलावून थकून जायच्या. जेवण थंड होऊ नये म्हणून जेवणाचे ताट त्यांच्या स्टडी रूम मध्ये घेऊन जायच्या. रमाई जेवणाचे ताट घेऊन आपल्या समोर बऱ्याच वेळापासून उभ्या आहेत याचे भान सुद्धा त्यांना नसायचे. त्यावर रमाई म्हणायच्या, "साहेब सांगा बरं, कोणत्या पुस्तकात लिहिले आहे की, आपल्या पत्नी व मुलाकडे लक्ष देऊ नये म्हणून". त्यावेळेस साहेब खळखळून हसून रमाईचा रुसवा दूर करायचे. आपली तहान भूक हरवून तासनतास त्या पुस्तकाशी समरस होऊन ज्ञान प्राशन करण्यात त्यांना खूप आनंद मिळत असत. त्यांची ज्ञानाची भूक ही भाकरीच्या भुके पेक्षा कितीतरी पटीने मोठी होती.
डॉ.बाबासाहेब परदेशात शिक्षण घेत असताना परिस्थिती मुळे त्यांना पुस्तके विकत घेऊन अभ्यास करणे शक्य नसल्यामुळे ते ग्रंथालयात बसूनच अभ्यास करीत असत. जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी देत असत. जेवणात वेळ वाया जाऊ नये म्हणून वाचता वाचता ग्रंथपालाची नजर चुकूवून पावाचे दोन तुकडे खाऊन घेत असत. ग्रंथपालांनी एकदा त्यांना पाहिले आणि त्यांना म्हणाले, "वाचक महाशय, आपणास ग्रंथालयाचे नियम माहिती असताना सुद्धा तो नियम आपण मोडलात. आपणास शिक्षा भोगावी लागणार". डॉ.बाबासाहेब म्हणाले, "होय मी अपराधी आहे. मला ग्रंथालयाचे नियम माहित असताना मी नियम मोडला आहे. मी शिक्षेस पात्र आहे. पण माझ्या जवळ पुस्तके घेण्याइतके पैसे नसल्यामुळे या ग्रंथालयातील एकही क्षण वाया जाऊ नये म्हणून वाचता वाचता दोन घास खाऊन घेतो झाले बस. त्यासाठी मी शिक्षा भोगायला तयार आहे. पण माझी आपणास विनंती आहे की, माझ्या साठी ग्रंथालयाची दारे बंद करण्याची शिक्षा सोडून दुसरी कोणती शिक्षा भोगायला मी तयार आहे".
ग्रंथपाल म्हणाला, "आपण आपला शब्द फिरवनार तर नाही ना!" त्यावर डॉ.बाबासाहेब म्हणाले, "दिलेला शब्द मोडला तर जगून उपयोगाचे काय? शब्दाला कृतीचे तारण नसेल तर शब्द वांझ ठरतात." ग्रंथपालांनी शिक्षा सुनावली की उद्या पासून मी दोन माणसाचे जेवण करून आणत जाईन, ते तुम्ही माझ्या सोबत दररोज जेवायचे. त्यावर बाबासाहेब म्हणाले, "अशी प्रेमळ शिक्षा कोण नाकारेल?". एके दिवशी संध्याकाळी डॉ.बाबासाहेब ग्रंथ वाचनात एवढे मग्न झाले होते की, ग्रंथालयाची दारे बंद होऊन त्यात ते कोंडले गेले याचे भान सुद्धा त्यांना नव्हते. त्यांच्या लक्षात आले तेव्हा ते दुःखी न होता त्यांना बरेच झाले असे वाटले. कारण रात्रभर ग्रंथालयातील ग्रंथ वाचण्यास मिळतील म्हणून त्यांना आनंद झाला. अन्नपाण्याविना रात्रभर ज्ञानपिपासू राजा ज्ञान प्राशन करत होता. या ग्रंथालयातील जगातील सर्वात जास्त ग्रंथ वाचनारा भारतीय महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे रेकॉर्ड आहे.
चोवीस तासांपैकी अठरा अठरा तास अभ्यास करून एमए ,पीएचडी, डीएससी, डिलीट, बार ॲट लॉ या अती उच्चतम पदव्या घेऊन जगातील सर्वच विद्यार्थ्यांच्या समोर आदर्श ठेवला. प्रत्येक विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेबांचा आदर्श समोर ठेवून अभ्यास करावा. तो आदर्श कठीनातील कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे सामर्थ्य देते. डॉ.बाबासाहेब म्हणतात की, "विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास गमावता कामा नये. आत्मविश्वासा सारखी दुसरी मोठी शक्ती नाही. यश अपयश पचवीण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यात असावे. ग्रंथ वाचनाने विद्यार्थ्यांची वने प्रगल्भ होतात. विचारांच्या कक्षा रुंदावतात. नवीन नवीन ज्ञान आत्मसात करण्याची जिद्द विद्यार्थ्यात असावी. परिश्रम, जिद्द आणि ग्रंथप्रेम या मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यात रुजविण्याचे कार्य त्यांच्या पालकांनी आणि शिक्षकांनी नियमित करावेत. तरच सक्षम विद्यार्थी तयार होतील."
- आर. डी. झगडे, नांदेड
( 9922684206 )
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .