नांदेड ( शालेय वृत्तसेवा ):
जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे आरोग्य संतुलित राखण्यासाठी शालेय पोषण आहारासोबतच राजगिरा लाडू देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष' म्हणून घोषित केले आहे. पौष्टिक तृणधान्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोदो, कुटकी, सावा, राजगीरा या पिकांचा समावेश केला गेला आहे. त्या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जागरुकता निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आहारात तृणधान्याचा वापर व्हावा याकरिता शासन परिपत्रकानुसार 15 आँगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात राजगीरा लाडू देण्यात येण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी सर्व गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत मुख्याध्यापक यांना दिले आहेत.
त्यानुसार आज जिल्ह्यातील सर्व अनुदानित आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राजगिरा लाडूचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .